*आले (अद्रक) लागवड*
आले पौराणिक काळापासून लागवड करतात. आल्यातील विशिष्ठ चव आणि स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे .
*हवामान व जमीन*
आल्यासाठी उष्ण आणि दमट हवामान चांगले असते . थंडीमुळे आल्याची पालेवाढ थांबते आणि जमिनीत खोडाची वाढ सुरु होते . मात्र शेतकऱ्यांच्या अनुभवावरून असेही दिसून आले कि , सातार्यापासून मराठवाड्यापर्यंत पिक येऊ शकते . समुद्र किनार्याच्या भागात जेथे २०० से. मी. किवा थोडा जास्त पाऊस पडतो तेथे पावसाळी पाण्यावर आले घेतले जाते . समुद्र सपाटीपासून १०० ते १५०० मी. उंच पर्यंत प्रदेशात आल्याची लागवड करता येते.
आल्यासाठी मध्यम खोलीची उत्तम निचरा असलेली कसदार जमीन उत्तम असते . नदीकाठच्या पोय्ताच्या गाळ मिश्रित जमिनीत आले उत्तम येते . जमिनीवर पाणी तुंबून राहिल्याने या पिकाला हानिकारक असते . एकाच जमिनीत सारखे सारखे आले घेऊ नये , त्याने आल्यावर येणाऱ्या मर रोगाचे नियंत्रण करणे अवघड जाते .
*पूर्वमशागत*
आल्याचे गड्डे जमिनीत वाढत असल्यामुळे सखोल पूर्व मशागत करणे गरजेचे असते . जमीन लोखंडी नांगराने ३०-४० से. मि. खोल उभी आडवी नांगरून घ्यावी . या पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची आखणी निर्नाल्या पाधात्तीने केली जाते . हळव्या जमिनीत सफाट वाफे पद्धत , मध्यम व भारी जमिनीत सऱ्या पद्धत वापरतात . जमिनीत ४० गाड्यांपर्यंत (२० टन ) शेणखत टाकावे .
महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत रुंद वाराम्ब्याची पद्धत फायदेशीर ठरली आहे . सफाट वाफे ३X २ मी . आकाराचे करतात दोन वरम्ब्यात ६० से. मी . अंतर ठेवतात . तर गादी वाफ्यावर लागवड करताना ३X १ मी . आकाराच्या १५-२० से. मी . उंच वाफ्यावर लागवड करतात .
*बियाणे आणि लागवड*
महाराष्ट्रात माहीम या स्थानिक जातीची लागवड करतात . या जातीमध्ये मोक्य आणि आंगर्या असे दोन प्रकार आढळतात . चांगल्या प्रतीचे निरोगी ३-५ से. मी . लांबी व अंदाजे २०-२५ ग्राम वजनाचे आणि दोन ते तीन कोंब रुजण्या इतपत डोळे असलेले बियाणे निवडावे . एक हेक्टर लागवडीसाठी साधारणपणे १००० – १२०० किलो बेने लागते . साध्या वाफ्यात आल्याची लागवड २५ X २२.५ से. मी . अंतरावर करतात . बेणे ४-५ से. मी . खोल लाऊन मातीने झाकावे . लागण कोरडित करून हलके पाणी सोडून वाफे भिजवतात . गड्डा लावताना कोम्बाची टोके जमिनीच्या वरच्या बाजूस येतील अशी काळजी घेऊन लागण करावी . आले कीड – रोगाला नाजूक असल्याने कंद लागवडीच्या वेळी प्रतिबंध उपाय म्हणून डायथेन झेड ७८ आणि नुवाक्रोन अनुक्रमे २५० ग्राम आणि १०० मि. लि . १०० लीटर पाण्याच्या मिश्रणात बुडवून लावावे . मी महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आल्याची लागवड करतात .
*अंतर मशागत*
लागवडीनंतर १५-२० दिवसात कोंब जमिनीच्या वर दिसू लागतात . त्यानंतर लगेच कोम्बना धक्का न लागेल अशी काळजी घेऊन वाफ्यातील तण काढून टाकावेत . वेळोवेळी हात खुरपणी करून तन काढावे . पिक १२० दिवसाचे झाल्यावर हलकी खोदणी करून दुसरा वरखताचा हफ्ता द्यावा त्यामुळे गद्याची नीट वाढ होण्यास मदत होते .
*पाणी*
लागण होताच एक हलके पाणी द्यावे . पाऊसमाण लक्षात घेऊन दर ६ ते ८ दिवसांनी पिकास पाणी द्यावे .
*वरखते*
लावणीच्या वेळी १०० किलो अमोनियम सल्फेट , ३०० किलो सुपर फोस्फेट व ८० किलो म्युरेट ऑफ पोटाश वाफ्यात टाकावे व त्यानंतर ६-८ आठवड्यांनी ५० किलो व १२० दिवसांनी १०० किलो युरिया द्यावा .
*काढणी व उत्पादन*
आल्याचे पिक ७ महिन्यात तयार होते मात्र आले सुन्ठेकरिता लावले असल्यास ८.५ ते ९ महिन्यात पिक तयार होते . जानेवारी महिन्यात पाने पिवळी पडून वाळू लागतात . वाळलेला पाला कापून पाला पाचोळा वेचून घ्यावा कुदळीने खोडून आल्याच्या गड्ड्यांची काढणी करतात . खणताना गड्ड्याना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी . आले वेचून पाण्याने स्वच्छ धुऊन गड्डे आणि बोटे (नवीन आले ) वेगळे करावे . उत्पादन १० ते १५ टनापर्यंत येऊ शकत .
काढण्याच्या वेळी चांगला भाव नसेल तर आले न काढता त्यास दर १० दिवसांनी पाणी देणे चालू ठेवतात . एप्रिल अखेर कंदावर पुन्हा फुटवे येउन पुन्हा त्यांची वाढ सुरु होते .त्यानंतर त्यास वाढीसाठी आधीच्या इतकी खाते द्यावीत अशा द्विहंगामी पिकाची काढणी पुढील ऑगस्ट मध्ये करतात . या पिकाचे उत्पादन ३० ते ४० टनापर्यंत जाते .
*सुंठ तयार करणे*
आले जमिनीतून काढल्यानंतर त्यावरील माती पाण्याने धून आले स्वच्छ करतात उन्हात सुकविल्यावर हे आले पुन्हा पाण्यात भिजू देतात . साल नरम झाल्यावर त्यावरील साल कोरड्या फडक्याने घासून काढतात . त्यानंतर चुन्याच्या निवळीत तीन टप्प्याने भिजत ठेवावे . त्यानंतर हवाबंध खोलीत गंधकाची धुरी देतात . नंतर उन्हात चांगले सुकतात . अशा तर्हेने तयार झालेले सुंठ ओल्या आल्याच्या मानाने १५ ते २० टक्के या प्रमाणात मिळते दर हेक्टरी ७५०० किलो आले किवा १८५० किलो सुंठ मिळते
No comments:
Post a Comment