◆खोडवा ऊस खत व्यवस्थापन-
किफायतशीर ऊस शेती करताना जास्तीत जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते. कारण खोडवा पीक घेताना जमिनीची पूर्वमशागत, बेणे, लागण, उसातील आंतरमशागत इत्यादी बाबींवरील खर्च जवळ जवळ 60 टक्यांता पर्यंत बचत करता येतो. ज्या ठिकाणी पाण्याची सोय बऱ्यापैकी आहे अशा ठिकाणी पाचटाचे आच्छादन, आंतरमशागत करून खोडव्याचे उत्पादन चांगले घेता येते. पिकाच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे खोडवा विरळ फुटतो, नांग्या पडतात, रोग किडींचा प्रादुर्भाव वाढतो, परिणामी ऊस उत्पादनात एकरी आठ ते 10 टनांनी घट दिसून येते.
■खोडव्याचे व्यवस्थापन –
●ऊस तुटून गेल्यानंतर पाचट जाळू नये, त्याचे आच्छादन करावे. पाचट हा जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला पर्याय आहे. पाचट आच्छादनामुळे जमिनीचे तापमान योग्य राहते, जमिनीत ओलावा टिकून राहतो. तणांची वाढ होत नाही, पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, खोडवा चांगला फुटतो. पाचट जाळल्यास एकरी चार ते पाच टन मिळणाऱ्या पाचटाची राख होतेच, त्याचबरोबर अधिक तापमान वाढल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील सेंद्रिय पदार्थ जळून जातात. जमिनीच्या जैविक, भौतिक व रासायनिक सुपीकतेवर अनिष्ट परिणाम होतो. ऊस तुटून गेल्यानंतर पाचट सरी आड सरी दाबून बसवून घ्यावे.
●ऊस लागण जोड ओळ पद्धतीने केली असल्यास रिकाम्या पट्ट्यात पाचट चांगले दाबून बसवावे. सरीत पाचट दाबल्यानंतर जमिनीच्या वर दिसणाऱ्या खोडक्याल धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्याव्यात. बुडख्याच्या छाटणीनंतर लगेच 0.1 टक्का कार्बेन्डाझिमची फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो. पाचटाचे आच्छादन न केलेल्या रिकाम्या सरीच्या बगला नांगरीच्या साहाय्याने 15 दिवसांच्या आत फोडाव्यात, बगला फोडताना बैल पाचटवरून चालतील याची दक्षता घ्यावी म्हणजे बैलांच्या पायाखाली पाचटाचे तुकडे होतील, पाचट दाबले जाईल.
●पाचट दाबून घेतल्यानंतर एकरी चार किलो या प्रमाणात पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक शेणखतात मिसळून पाचटावर समप्रमाणात पसरावे. त्याचबरोबर एकरी 50 किलो युरिया आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे.
●खोडवा उसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खताचा पहिला हप्ता आणि हलके पाणी महत्त्वाचे असते. यासाठी ऊस तुटून गेल्यानंतर 15 दिवसांच्या आत रिकाम्या सरीच्या बगला फोडल्यानंतर खोडवा पिकाच्या एकूण शिफारशीत खतमात्रेपैकी एकरी 1.5 गोणी युरिया, तीन गोणी सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक गोण म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा सरीच्या बगलेत द्यावी. खते दिल्यानंतर बगला फोडलेल्या सरीत बळी नांगर चालवावा, म्हणजे खते मातीआड होतील, पाणी देणे सुलभ होते. पहिले पाणी दिल्यानंतर पाचट चांगले तुडवून घ्यावे.
●खोडवा पिकात पाणी तुडुंब भरू नये, कारण यामुळे फुटवा कमी येतो. सुरवातीपासून पिकाच्या गरजेनुसार हवामान व जमिनीची प्रत लक्षात घेऊन उन्हाळ्यात आठ ते 10 दिवसांनी, हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांनी आणि पावसाळ्यात आवश्याकतेनुसार पाणी द्यावे. सुरवातीच्या पाण्याच्या दोन पाळ्या सर्व सऱ्यांना द्याव्यात. पाचट दाबून घ्यावे, त्यानंतर मात्र रिकाम्या सरीत पाणी द्यावे. पाचट आच्छादन केलेल्या सरीत पाणी देण्याची गरज नाही.
●खोडव्यात नांग्या पडल्या असल्यास जमीन वाफशावर असताना एक डोळ्यांच्या रोपांची पुनर्लागण करून तुटाळ भरून घ्यावे किंवा एका बाजूच्या चांगल्या खोडक्याय काढून तुटाळ भरून हलके पाणी द्यावे.
●खताचा दुसरा हप्ता -
साधारण सहा ते आठ आठवड्यांनी खोडव्यास नत्र खताचा दुसरा 30 टक्के हप्ता म्हणजेच एकरी 1.5 गोण्या युरिया निंबोळी पेंडीबरोबर घोळून द्यावा. बाळबांधणी अवजाराच्या साह्याने हलकी भरणी करावी, त्यामुळे खते माती आड होतात, जमीन मोकळी होऊन मुळांची कार्यक्षमता वाढते.
●खताचा तिसरा हप्ता आणि मोठी बांधणी -
खोडवा पीक 3.5 ते चार महिन्यांचे झाल्यानंतर फुटव्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि पिकाच्या योग्य वाढीसाठी मोठी भरणी करावी, भरणी अगोदर रासायनिक खताचा तिसरा आणि शेवटचा हप्ता म्हणजे शिफारशीत खतमात्रेपैकी एकरी दोन गोणी युरिया, तीन गोणी सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक गोणी म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा उसाच्या बुडात द्यावीत. रीजरच्या साहाय्याने भरणी करावी.
●ऍसिटोबॅक्टार या द्रवरूप जिवाणू खताची फवारणी -
ऊस तुटल्यानंतर एकरी एक लिटर ऍसिटोबॅक्टिर या द्रवरूप जिवाणू संवर्धकाची प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून 45 ते 60 दिवसांनी पानांवर फवारणी करावी आणि शिफारशीत नत्राची मात्रा 50 टक्यां0 नी कमी करावी.
●सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताची फवारणी -
खोडवा पीक साधारण 70 ते 75 दिवसांचे झाल्यानंतर मल्टिमॅक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमायक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खताची प्रत्येकी दोन लिटर प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित पहिली फवारणी उसाच्या पानांवर करावी. या द्रवरूप खतांची दुसरी फवारणी प्रत्येकी तीन लिटर प्रति 300 लिटर पाण्यात मिसळून 90 दिवसांनी करावी. फवारणी करताना उसाची पाने दोन्ही बाजूंनी पूर्ण भिजतील याची काळजी घ्यावी. पानांद्वारे अन्नद्रव्यांचे चांगले शोषण होत असल्यामुळे ऊस वाढीवर चांगला परिणाम होतो.
◆पाण्याची कमतरता असलेल्या भागात खोडव्याचे व्यवस्थापन -
●पाचट कुजण्यासाठी-
नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंची गरज असते. यासाठी शेतात पसरलेल्या पाचटावर एकरी 50 किलो युरिया, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक लिटर पाचट कुजविणारे द्रवरूप जिवाणू खत 500 किलो शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून सारख्या प्रमाणात पसरावेत. त्यानंतर उसास पाणी द्यावे. पाचटामुळे सुरवातीस पाणी पोचण्यास वेळ लागतो. तरी सुरवातीस सर्वत्र पाणी बसेल याकडे जातीने लक्ष द्यावे. आवश्यसकता भासल्यास जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून घ्यावे, पाचटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते. प्लॅस्टिकच्या पिशवीतील एक ते दीड महिन्यांची रोपे वापरून नांग्या भरणे आवश्यजक आहे.
●रासायनिक खतांचा वापर -
खोडव्याला पाणी दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली खतमात्रा द्यावी. खते देण्यासाठी पहारीसारख्या अवजाराचा वापर करावा. सदर पद्धतीनुसार रासायनिक खतांची मात्र पहारीसारख्या अवजाराच्या साहाय्याने, जमिनीत वाफसा असताना, दोन समान हप्त्यांत द्यावी. पहिली खतमात्रा 15 दिवसांच्या आतच पूर्ण करावी. पहारीने बुडख्यांपासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर 15 ते 20 सें.मी. ठेवावे. दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 120 दिवसांनी द्यावी. नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.
को 86032 या ऊस जातीस 25 टक्के खतमात्रा वाढवून द्यावी.
खोडवा पिकास पहारीच्या अवजाराच्या साहाय्याने खते दिल्यास खते मुळांच्या सान्निध्यात दिली जातात. मात्र दिलेली खते पिकास उपलब्ध होण्यासाठी पाणी देण्याची गरज आहे. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने हवेद्वारे फारच कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होतो. खत वाहून जात नाही, तणांचा प्रादुर्भाव फारच कमी होऊन खुरपणीवरील खर्चात बचत होते. रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. ऊस उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
◆पीक व्यवस्थापन उपाययोजना –
●पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एक सरी आड एक सरी पद्धतीने पाणी द्यावे.
●उभ्या उसातील पक्व पिवळी किंवा वाळलेली पाने काढून आच्छादन करावे.
●एकरी एक लिटर ऍसिटोबॅक्ट र या द्रवरूप जिवाणू खताची प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून ऊस तुटल्यानंतर 45 ते 60 दिवसांनी पानांवर फवारणी करावी.
●साधारण एक महिन्याच्या अंतराने दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅशची या प्रमाणात उसाच्या पानांवर फवारणी करावी.
●ऊस तुटल्यानंतर 60 ते 75 आणि 90 ते 105 दिवसांच्या दरम्यान एक महिन्याच्या अंतराने एक लिटर मल्टिमायक्रोन्युट्रिएंट आणि एक लिटर मल्टिमॅक्रोन्युट्रिएंट द्रवरूप खत प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून उसाच्या पानांवर फवारणी करावी.
●शेताच्या सभोवती वारारोधक शेवरीसारखे पीक असल्यास अधिक फायदा होतो.
●ज्या शेतावर सध्या पाण्याची उपलब्धता मुळीच नाही अशा ठिकाणी ऊस तुटून गेल्यानंतर पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे शेतकरी खोडवा काढून टाकण्याच्या मनःस्थितीत असतात. अशा शेतकऱ्यांनी ऊस तुटून गेल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खोडवा पीक नांगरू नये. पाचट न जाळता ते पसरावे. पाण्याशिवाय सदर खोडव्याचे शेत तसाच ठेवावा. पुढे एखादा पाऊस झाल्यास खोडक्याे चांगल्या फुटू शकतात. जमीन भारी असेल तर पाणी धारणक्षमता चांगली असल्यामुळे खोडवा पीक तग धरू शकते. उन्हाळी पाऊस आणि मोसमी पावसाने वेळेवर साथ दिल्यास खोडवा पिकाची वाढ होऊ शकते.
_
No comments:
Post a Comment